गावाकडची नाती-गोती | कोकण संस्कृती | Memories of 90th childhood

SD &  Admin
0

निसर्गरम्य कोकणातल्या लाल मातीत माझा जन्म झाला. इथेच लहानाचा मोठा झालो. या लाल मातीत शिकलो, पडलो, उठलो, मस्ती केली, सर्व काही. आज जो काही आहे, तो याच मातीमुळे. खरं तर, या पंढरीत जन्म घेतला, हे मी पुण्यच समजतो. असं म्हणतात, जन्म झाल्यावर पाचवीला सटवी येऊन आपले भाग्य लिहिते. पण मला वाटतं, सटवीने माझे सौभाग्य या स्वर्गसमान असलेल्या कोकणातल्या लाल मातीत जन्म देवून पहिलेच लिहिले होते.

    स्वर्गाला ही लाजवेल अशी मायेची उब या मातीत आहे. या मातीत जेव्हा वरुण राजाचे माणिक मोती पावसाच्या रुपात मिसळतात, तेव्हा स्वर्गातील प्राजक्ताच्या झाडाचा सुंगंध ही फिका पडेल. ही फक्त मातीच नाही, तर ही आमची जीवन दायिनी आहे. पोटाची शुदा भागवतेच बरोबर मायेची उब ही आमच्यावर बहाल करते. “किती गुणगाण गावे या मातीचे, शब्द अपुरे पडती. तुम्हाला वाटेल असे काय आहे या गावच्या लाल मातीत, येवढे गुणगाण गात आहेस. गड्या येथे अमृता समान गोड रसाळ आंब्या, फणसाची रास. एक थेंब पडती जरी जिभेवरी होई आत्मा तृप्त. येथे काजूची किमयाच न्यारी, करवंदे, जांभळे, कोकम म्हणती आम्ही आहोत डोंगरावरच्या राण्या. याच सौंदर्याला साजेशी असी नाती-गोती आहेत माझ्या गावा.”

गावाकडची नाती-गोती | कोकण संस्कृती | Memories of 90th childhood

माया ममतेने नटलेली नाती मनावर सतत भुरळ घालत असतात. प्रत्येक सुख-दु:खात हसत खेळत एकमेकांना साथ देत असतात. कोणताही सण असो, कार्यक्रम असो प्रत्येकजण हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत असतो. शब्दाची, विश्वासाची आणि कर्तव्याची साक्ष हेच आमुचे नात्याचे पैलू.

वेळ सकाळची होती. लोकं आप-आपल्या कामात व्यस्त होती. अचानक गणू आबाची  तब्बेत बिघडली. घरघुती औषध उपचार करून ही त्याला बरे वाटत नव्हते. घरच्यांना काळजी वाटू लागली. चांगला हट्टा कट्टा माणूस हंतरुणाला लागल्यामुळे गावातील सगळेच काळजीत पडले होते. गणूला आबाला ना उठता येत होते, ना धड एका ठिकाणी बसता येत होते. सतत त्याच्या शरीराची चल बिचल सुरु होती. तो मनाने खूप घाबरून गेला होता. सगळे उपचार व्यर्थ गेल्यावर, शेवटी लोकांनी त्याला तालुक्याच्या दवाखान्यात न्यायचे ठरवले. तालुक्याच्या ठिकाणी जायचे म्हटलं की, आजारी माणसाला नेण्यासाठी बांबूच्या डालाची कावड करावी लागत असे. ९० च्या दशकात खरं तर.., आमच्या गावातून तालुक्या ठिकाणी जाण्यासाठी वाहन वैगरे यांची सोय नव्हती. अशा परिस्थितीत जर एखाद्या माणसाला गंभीर आजार झाला असेल तर, त्याला कुण्या दणकट माणसाच्या पाठीवरून किंवा खूपच आजारी असेल किंवा वजनाने अधिक असेल तर, त्याला बांबूच्या डालाच्या मदतीने तिची कावड करून दवाखान्यात न्यावे लागत असे. आणि असे करण्यासाठी माणसांना खूप मेहनत घ्यावी लागत असे. तरीही संकटमय परिस्थित गावातील माणसं एकमेकांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्यासाठी मागे सरत नसत. खूप कौतुक वाटतं, माझ्या या गावच्या माणुसकीच्या नात्याचं.

बालपण हे सगळ्यांसाठीच प्रिय असतं. आपण बालपणीच्या आठवणींपासून कधीच वेगळ राहू शकत नाही. सुख- दु:खाच्या चढ उतारावर बालपणीच्याच आठवणी आनंदाचे झाड म्हणून आपल्या सेवेला धावून येतात. आणि त्यात आपण मनसोक्त डुबकी मारतो. याचं बालपणीच्या पारावर आपल्यावर मायेची उब आपल्या जवळच्या माणसांपासून मिळते. ही उब खूप मायेची असते. ही उब आपल्याला खऱ्या आनंदाची, सुखाची आणि बालपणीच्या सुखद आठवणींच झाड असते. याचं झाडाखाली आपलं बालपण सुखात वाढत असतं. अशाच बालपणीच्या पारावर आपण केलेल्या बाललीलांच आनंदाचं झाड हे पुस्तक आहे. प्रत्येक शब्द हा तुम्हाला नक्कीच बालपणीच्या विश्वात घेवून जाईल, हे तुम्हाला विश्वासाने सांगेन. तुम्हाला बालपणीच्या विश्वातले जग जगायचे असेल तर नक्कीच हे पुस्तक खरेदी करा. शुल्क फार कमी आहे. PDF आणि Amazon Kindle मध्ये उपलब्ध आहे     

 

गावाकडची नाती-गोती | कोकण संस्कृती | Memories of 90th childhood

माणसाच्या आयुष्यात उत्सव, कला खूपच महत्वाचा भाग असतात. त्यांच्या शिवाय आपण विचार ही करू शकत नाही. हे माणसा-माणसाला जोडण्याचे काम करतात. यांच्यातलाच महत्वाचा भाग म्हणजे नाती-गोती. मुलीचं लग्न झालं की, ती सासरी निघून जाते. नवीन वातावरणात आणि नवीन माणसात स्वतः ला एकरूप करण्याचा प्रयत्न करते. सुख-दु:खाला आपले नसीब समजून सासरी सगळ्यांशी आनंदाने राहण्याचा प्रयत्न करते. रस्त्यात अनेक काटे येतात, परंतु अशात ती धीटपणे काटे ओलांडून आपले लक्ष गाटण्याचा यशस्वी प्रयत्न करते. कधी प्रयत्न अपुरे पडले तर, पुन्हा उठून लक्ष गाठण्याचा प्रयत्न करते. पतीला आपला परमेश्वर माणून घरातील सर्वांशी कर्तव्याच्या भावनेने, आदराने वागते. कधी तिला त्यांच्याकडून प्रेम मिळते, तर कधी तिला त्रास. तरीही ती समजते की, हा आपला संसार आहे. संसारात भांड्याला भांडे हे लागतेच. अशा वेळी आपल्यालाच समजून घेणे आवश्यक आहे.


Read More : माझ्या बालपणीचा पावसाला | ९० व्या दशकातला पावसाला | 90th Childhood Rainy Season

सुख - दुःखाच्या या कसरतीवर तिला माहेरची आठवण खूप खूप येते. दिवस भर घरात राबून झाल्यावर रात्री एकांतात खूप रडते. तिच्या समोर माहेरच्या आठवणी उजळून येऊ  लागतात. लहानपणी आई बाबाबरोबर केलेला हट्ट. अंगणात भावांबरोबर खेळलेले मजेशिर खेळ. खेळता खेळता झालेली त्यांच्याबरोबर भांडणे. बाबांनी आणलेला खाऊ. भावांबरोबर वाटून एकत्र खात बसलेल्या आठवणी. आईच्या खुशीतील मायेची उब. आणि बरच काही. या विश्वात बिचारी रंगून जाते. डोंगरा एवढ्या दुःखात सुखाच्या या आठवणी दु:खाला नष्ट करून टाकतात आणि पुन्हा एकदा जोमाने आपल्या संसारात गुंतून जाण्यास तयार राहते.

अशा या सासरवशिनीला जेव्हा माहेरवरून बुलावा येतो, तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा होतात. माहेरच्या ओढीने ती आनंदून जाते. काय करावे आणि काय नाही असे तिला वाटून जाते. जाण्यापूर्वीच ती अनेक स्वप्नांना जागे करते. माहेरी जाण्याच्या आदल्या दिवशीची रात्र तिला काही झोपू देत नाही. कधी एकदा आईला मिठी मारेल, असे तिला झालेले असते. लहान भावांचा चेहरा तिच्या चेहऱ्यासमोर येऊन उभा राहतो. हे सर्व आठवताना डोळ्यातून तिच्या अश्रूंची गंगाच वाहत असते.

सकाळी पहाटे लवकर उठून माहेरी जाण्याची तयारी करते. आज तिला कशाचे ही भान नसते. भान असते ते फक्त माहेरी जाण्याचे. सगळ्यांचा निरोप घेऊन ती माहेरी येयाला निघते. आज तिला घेवून जाणारा रस्ता हा कुणास ठावूक संपतच नव्हता, असं तिला वाटत होते. शेवटी ती माहेरी पोहचते. घरी पोहोचताच आईला घट्ट मिठी मारून ढसा ढसा रडू लागते. आज तिला आईच्या मायेची उब स्वर्गात घेवून जाणारी वाटत होती. तिचे अश्रू थांबतच नव्हते. आज ती आईच्या कुशीतून बाजूला व्हायला तयारच नव्हती. आई तिला मायेने गोंजारत होती. आज तिची लाडकी लेक आपल्या माहेरी आली होती. किती दिवस झाले होते तिला सासरी जाऊन. माय लेकीची अशी ताटातुट दोघींना ही असहाय्य होती. परंतु काय करणार स्त्रीचा जन्म आहे. कधी ना कधी अशी वेळ ही सर्वच स्त्रियांवर येते. 

Read More :    ९० व्या दशकातलं बालपण | कधी ही न संपणारा प्रवास | 90th Childhood Memories | ब्लॉग - १  

पण काहीही असो, माहेरी आल्यावर प्रत्येक स्त्रीचा आनंद हा गगनात मावेनासा झालेला असतो. आणि त्यात नवी नवरी असेल तर, तिला जणू काही माहेर पहिल्यांदाच अनुभवते आहे, असे तिला वाटते. घरातील प्रत्येक खोलीत जाऊन, ती तिच्या बालपणीच्या आठवणींना स्पर्श करत राहते. तिचा चेहरा आनंदाने गहिवरून गेलेला असतो. आपल्याच विश्वात ती घरभर सैरावैरा धावत सुटते. आज तिला कोणीही बोलणारे नसते. आई-बाबा ती काय करत आहे, हे फक्त पाहतच राहतात. मुलगी एवढ्या दिवसांनी माहेरी आली आहे, तिला काय करायचे आहे ते करू दे, म्हणून ते तिच्या आनंदात सहभागी होऊन, एका बाजूला उभे राहून, तिच्याकडे आनंदाने पाहत असतात. आपली लाडक्या लेकीकडे बघून त्यांना बालपणीच्या विश्वात घेऊन जाते. लहानपणी तिने केलेले हट्ट. आईने काम सांगितले म्हणून दिवसभर न खाता रुसून बसलेली. मोठ्या आणि लहान भावांबरोबर झालेली उंदीर मांजराची भांडणे. बाबांची ती लडकी, हेच मला पाहिजे म्हणून बाबांच्या पाठीमागे लागणारी. आईच्या स्वयंपाकात थोडीसी चूक झाली की, मी नाही ते खाणार, म्हणून न खाता झोपणारी. मग बाबा हळूच तिला मायेने जवळ घेवून स्व:ताच्या हाताने भरविलेला घास. अशा बऱ्याच आठवणींनी त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. या उलट लेक सासरी गेली की, ती काय करत असेल? तिला सासरचे सांभाळून घेतील की नाही? कोणी तिला ओरडणार तर नाही ना...? माहेरी स्वयंपाक घरात न घुसणारी पोरगी, सासरी गेल्यावर तिला काही अडचणी तर येणार नाही ना...? नवरा काही चुकले तर ओरडणार तर नाही ना...? अशा विचारांनी ते ही व्याकूळ झालेले असतात.

आपल्या लाडक्या लेकीला आनंद देण्यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत. तळ हाताच्या फोडाप्रमाणे संभाळलेली मुलगी जेव्हा, सासरी निघून जायला तयार होते, तेव्हा त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांना पुन्हा: एकदा सुखद अश्रूंची वाट मिळते. दोघही अश्रूंच्या नदीत डुबून गेलेले असतात. या धरतीवर मुलगी ही आई-बाबांच्या छायेतच जास्त सुरक्षित असते, हेच खरे.

माहेरी असताना तिने लावलेल्या अनेक फुल-झाडांना नेहालत, त्यांच्यासी जणू काही गप्पा मारत, आपण त्यांना भेटायला आलो आहोत, असे त्यांना सांगत असते. माहेरच्या प्रत्येक आठवणींनी ती मनाने भरून गेलेली असते. तिला प्रत्येक वस्तू बालपणीच्या दुनियेत घेवून जात असते. मैत्रिणींबरोबर खेळलेले खेल, त्यांच्या बरोबर मारलेल्या गप्पा गोष्टी, त्यांच्यात झालेला रुसवा फुगवा, आज तिला हवाहवासा वाटत होता. खरं तर.., आज तिच्याकडे आठवणी शिवाय काहीच नसते, कारण तिच्या बरोबरच्या मैत्रिणीं देखील लग्न करून आपल्या सासरी गेलेल्या असतात. 

खरच.., माणसाच्या आयुष्यात नाती-गोती, सण, उत्सव किती महत्वाचे असतात हे सांगायला नको. माणसा-माणसाला जोडण्याचे काम ते मायेने करत असतात. यात तडजोड काहीच नसते. आई-बाबा, भाऊ -बहिण, आजी-आजोबा, मामा-मामी, मावशी-काका, आत्या, काका-काकू, गावातील भावकी, गावातली इतर माणसं, मित्र-मैत्रिणी ई. किती गोड आणि मायेने एकमेकांशी बांधलेले असतात. सुख-दु:खात अगदी खांद्याला खांद्याला देऊन उभी असतात. आजही आठवतं, गावात कुण्या एका घरात माणूस आजारी पडलं असेल तर.., पाच ते दहा मिनिटात सारा गावं त्याला बघण्यासाठी हजर होतो. जो तो आपल्या परीने त्याला मदत आणि आधार देण्याचे काम करत असतो. माझ्या बालपणीची माणसं तर.., मायेने खचा खच भरलेली होती. घरात एखाद्या वेळी जेवण नसेल, तर उपाशी राहण्याची वेळच येत नव्हती, कारण  माझं गावं हे एक घरच आहे. नुसतं पोरगं उपाशी दिसलं तरी.., हाताला पकडून माणसं  घरात जेवायला घेवून जायची. सगलं गावं एकाच माणुसकीच्या नात्याने जोडलेलं होतं. खरंच मी किती भाग्यवान होतो, असं  बालपण मला जगायला मिळालं.

Read More : ९० व्या दशकातील बालपण | Childhood in the 90s | माझा पहिला पावसाला | ब्लॉग - २

मी भाग्यवान समजतो की, माझा जन्म कोकणासारख्या निसर्गरम्य आणि मायाळू माणसात झाला. गावातील प्रत्येक माणूस माणुसकीच्या नात्याने एकमेकांशी जोडलेला होता. आज येथून जेव्हा मी बालपणीच्या विश्वात डोकावून बघतो, तेव्हा मला प्रत्येक दिवस हा स्वर्गसुखासारखा होता, असे वाटते. बालपणी ज्यांच्या खुशीत माझा जन्म गेला, असे माझे आजी आजोबा, मामा- मामी, काका–मावशी, भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिणी ई. ही सगळी नाती फक्त रक्ताचीच  होती असे नाही, तर गावातील प्रत्येक माणसाशी माझं कुठे ना कुठे हे नातं होतेच. खूप मजा येयाची. आज माझ्या डोळ्यातून कधी कधी अश्रू येतात. कारण असे की, ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. त्यांच्या कुशीत डोकं ठेवून रडलो. दंगा-मस्ती केली. ती काही माणसं मला सोडून देवा घरी गेलेत. मी त्यांना इथून कधीच भेटू शकणार नाही.

माझ्या गावातील बहिणी असतील, ज्या लग्न करून आपल्या सासरी गेल्यात. त्या आज कधी कधीच भेटतात. बालपणी त्यांच्याबरोबर खूप मस्ती केली होती. हट्ट केला होता. आज जेव्हा कधी गावाला जातो, तेव्हा या माणसांपैकी कोणीही नसतं. माझ्या बरोबरच्या मैत्रिणी देखील लग्न करून सासरी गेलेल्या आहेत. त्या देखील कधी कधीच भेटतात. खरच.., माणसाच्या जीवनात नात्या- गोत्याला किती महत्व असते, हे मला आज जाणवून येत आहे. माझ्या मनाला एक सतत प्रश्न पडत असतो की, आपण ज्यांच्या वर अधिक प्रेम करतो, ती माणसं आपल्या आयुष्यात अधिक काल राहत नाहीत.. असं का? या प्रश्नाच उत्तर आपण जाणतो, परंतु ते मान्य करायला आपलं मन तयार होत नाही. कारण आपण आपल्या माणसांवर जीवापाड प्रेम करत असतो.

आज कधी कधी वाटतं.., हे सगलं कुठे कमी तर होत नाही ना..?  एकदा प्रत्येक माणसाने विचार करायला हवा. हा.. जबाबदाऱ्या असतात, कामात व्यस्त असतात, ही कारणे देणे चुकीचे ठरेल. एक कळकळीने सांगू इच्छितो की, माणसाच्या जीवनात जर प्रेम करणारी नातीच नसतील तर..., तुम्ही जे जीवन जगता, त्याला काहीच अर्थ नाही. सुख-दुःखाच्या रस्सीवर फक्त रक्ताचीच नाती साथ देत नाहीत तर, आपल्या आजू बाजूची माणसं, आपले शेजारी, आपले नातेवाईक, आपले मित्र-मैत्रिणी तितकेच आपल्याला साथ देत असतात. त्यांना आपल्याला विसरता येणार नाही. 







Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!